मोहिते-पाटलांचे पुनर्वसन

महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी विजयसिंह मोहिते-पाटील यांची निवड करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले, परंतु त्यासाठी त्यांना एक वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. मोहिते-पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसने एक वर्षाहून अधिक काळ तिष्ठत ठेवले, हा कृतघ्नपणाच म्हणता येईल. प्रत्येक नेत्याच्या राजकीय जीवनात चढउतार असतात, त्याप्रमाणे मोहिते-पाटलांच्या राजकीय आयुष्यातला हा कठिण काळ होता. नेतृत्वाकडूनच खच्चीकरण होत असताना त्यांच्यापुढे पक्षत्यागाचा पर्याय होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार हवा मधल्या काळात तयार झाली होती, परंतु आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी त्यावर पडदा टाकला होता. तरीही त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता होतीच. आणखी तिष्ठत ठेवले असते तर नजिकच्या काळात वेगळे काही घडले नसतेच असे नाही.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्व ठेवले, त्याचवेळी राज्याच्या राजकारणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शंकरराव मोहिते-पाटील हे आक्रमक स्वभावाचे होते, त्यांचा राजकीय वारसा चालवणारे विजयसिंह मोहिते-पाटील सरंजामी थाटाचे असले तरी तुलनेने मवाळ प्रकृतीचे. राजकारणात आवश्यक तेथे तडजोड करणारे आणि विरोधकांबाबतही सहिष्णू धोरण ठेवणारे नेते. सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील घराण्याच्या राजकारणाबद्दल उलट-सुलट चर्चा करणारेही विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबाबत कधी एकेरीवर येऊन बोलत नाहीत, यावरून त्यांच्या राजकारणाचा पोत लक्षात यावा. राज्याच्या राजकारणातअनेक वर्षापासून यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे गट सक्रीय होते, किंबहुना ते आजही आहेत. वसंतदादांच्या पश्चात त्यांच्या गटाच्या बहुतांश नेत्यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले असले तरीही अधून मधून या गटाला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावीशी वाटते. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे या गटाचे नेतृत्व होते. त्याअर्थाने ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांपैकी ते एक होते.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर काँग्रेसशी निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या काहींनी वेगवेगळ्या कारणांनी पवारांचे नेतृत्व स्वीकारले. सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी विष्णूअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवस विचारमंथन करून पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राष्ट्रवादीची रिकामी बस थोडी भरल्यासारखी वाटली, तरीही बरीच रिकामी होती. शरद पवार यांना अपेक्षित असलेले पाठबळ महाराष्ट्रातूनच उभे राहात नसल्याचे चित्र दिसत होते, अशा काळात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेऊन सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मोहिते-पाटील आपल्याबरोबर येतील, हे पवारांनाही अपेक्षित नसावे. परंतु ते घडले आणि राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय वाढली. या घटनेकडे पाहताना मोहिते-पाटील यांचे व्यक्तिश: शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील ष्टद्धr(७०)ण काय आहेत याची कल्पना येऊ शकते. मोहिते-पाटलांचा हा निर्णय अनेकांना बुचकळ्यात टाकणारा होता. त्याची अनेक कारणे सांगितली जात होती. दिल्लीत वजन असलेले सुशीलकुमार शिंदे जिल्ह्याच्या राजकारणातले त्यांचे स्पर्धक असले तरी मोहिते-पाटील त्यांना कधीच जुमानत नव्हते. कारण मोहिते-पाटील यांना जनाधार होता आणि सुशीलकुमार पक्षनेतृत्वाच्या मर्जीत राहून राजकारण करणारे. दिल्लीतील वजनाच्या बळावर सुशीलकुमार शिंदे कायम उप्रव देत राहतील, ही एक भीती असावी. दुसरे म्हणजे आधीच्या एका विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटलांची मतांची आघाडी सत्तर-ऐंशी हजारांवरून सतरा-अठरा हजारांवर आली होती. शरद पवार यांनी दाखवलेल्या उप्रवमूल्यामुळे हे घडल्याचे स्पष्ट दिसत होते. शरद पवार यांच्या विरोधात गेल्यानंतर कदाचित आपल्या भविष्यातील राजकारणाला ते धोका ठरू शकतील, अशी भीतीही असावी. तिसरी शक्यता म्हणजे काँग्रेसमध्ये विश्वास टाकावा, असे नेतृत्व नसल्यामुळे शरद पवार यांचे नेतृत्व त्यांना अधिक विश्वासार्ह वाटले असावे. यापैकी कोणतीही गोष्ट खरी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापना काळात पर्यायाने शरद पवार यांच्या अत्यंत अडचणीच्या काळात मोहिते-पाटील यांनी त्यांना साथ दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना अल्पकाळ उपमुख्यमंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान केला, परंतु योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यावेळी जिल्ह्यातील त्यांचे पक्षांतर्गत विरोधक सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच काम करावे लागले.
गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी द्यायचे निश्चित झाले होते, परंतु विजयसिंहांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी ऐनवेळी स्वत:ची उमेदवारी जाहीर करून प्रचाराचा नारळही फोडला. त्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबातच कलह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. तो टाळण्यासाठी शरद पवार यांनाच माढा मतदारसंघातून उमेदवारीसाठी निमंत्रण देण्यात आले. शरद पवार यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वत: तेथून लढण्याचा निर्णय घेतला आणि मोहिते-पाटील कुटुंबातला गृहकलह टाळला. मोहिते-पाटील यांचा विधानसभेचा परंपरागत असलेला माळशिरस मतदारसंघ राखीव झाला होता. पुनर्रचनेत त्यांच्या मतदारसंघातला बराचसा भाग माढा मतदारसंघात गेल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र ते तेवढे सोपे राहिले नव्हते. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटलांच्या प्रभावक्षेत्राबाहेरील अनेक स्थानिक नेत्यांना बळ देऊन मोहिते-पाटलांचे वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत होते आणि त्याला बऱ्यापैकी यशही येत होते. मोहिते-पाटलांचा गट संपवण्याची प्रक्रियाच सुरू करण्यात आली होती. माढय़ामधून बबन शिंदे यांचे नेतृत्व उभे राहिले होते आणि ते मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे मोहिते-पाटलांसाठी माढा मतदारसंघ नाही देता आला, परंतु पंढरपूरमध्ये उमेदवारी दिली. अख्खा मतदारसंघच नवखा आणि त्यात पुन्हा विद्यमान आमदार सुधाकर परिचारक यांच्याविषयीची नाराजी या सगळ्याचे पर्यवसान त्यांच्या पराभवात झाले. पराभवानंतर मोहिते-पाटलांचा योग्य सन्मान राखला जाईल आणि त्यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्याही तशा अपेक्षा होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने तेवढे औदार्य दाखवले नाही. सुमारे तीसेक वर्षे सलग सत्ता उपभोगल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या वाटय़ाला राजकीय विजनवास आला होता. युतीच्या काळात ते सत्तेबाहेर होते, परंतु ती गोष्ट निराळी होती. यावेळी त्यांचा पक्ष सत्तेत असूनही ते सत्तेबाहेर फेकले गेले होते. मोहिते-पाटलांची गरज संपल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना साइड ट्रॅक केल्याची त्यांच्या समर्थकांची भावना तयार झाली होती. साखर संघाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. असे असले तरीही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे स्वत:चे नव्हे, तर पुत्र रणजितसिंह यांचे राजकीय भवितव्य काय असेल, यावरच मोहिते-पाटील घराण्याची भविष्यातील राजकीय वाटचाल अवलंबून असेल. त्याअर्थाने आगामी काळ विजयसिंह मोहिते-पाटील आणि अजित पवार या दोघांच्याही संयमाची कसोटी पाहणारा ठरेल.

टिप्पण्या

  1. एक दम बरोबर अणी छान पोस्ट आहे मोहिते-पाटलानसोबत झालेल्या राजकारणावर प्रकाश टाक्नारा लेख आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर