एका ‘सुपारी’ची डायरी

आम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स्पाँटेनिअस ओव्हरफ्लो म्हणतात तशी भस्सकन ओळ आली, ‘आम्हाला वगळा गतप्रभ होतील राजकारणे..’ आजच्या काळात इतकी वास्तवदर्शी ओळ कुणाला सुचायची टाप नाही. काव्यगायनाच्या सुपाऱ्या घेऊन गावोगावी िहडणाऱ्या कवींनी तर नादच करायला नको. सुपारी अंगातच असावी लागते. छपरी मिशा वाढवल्या आणि बटवा बाळगून सुपारी चघळली म्हणून इतकं वास्तववादी सुचणार नाही, मिस्टर नायगावकर. त्यासाठी कवितेतली सुपिरिअ‍ॅरिटी नव्हे तर वागण्या-बोलण्यात आणि जगण्यातही सुपारिअ‍ॅलिटी हवी. कवींचा एवढा राग राग का करतेय, असं वाटत असेल ना तुम्हाला? कशासाठी त्यांच्याबद्दल प्रेम बाळगायचं? बाईच्या जातीला धार्जिण असलेल्या या कवडय़ांना सुपारीची अ‍ॅलर्जी का म्हणते मी? सगळं चालतं त्यांना. ताडीमाडीब्रँडीव्हिस्कीतंबाखूसिगारेट. फक्त सुपारीचं वावडं. ते कोण एक बापट कवी वसंत समाजवादी, जायाचंच की कवातरी पट्दिशी म्हणायचेत कुठल्याही स्टेजवरून. त्यांनी लिहिली होती एक कविता सुपारीवर. काय तर म्हणे कवितेतला नायक लग्न झालेल्या आपल्या प्रेयसीच्या घरी जातो. तिथं तो आपल्या त्या प्रेयसीनं कशिद्यात साकारलेलं नवरा बायकोचं चित्र पाहतो आणि एकही टाका चुकला नसल्याबद्दल हळहळतो. निघताना सुपारी खाल्ल्यावर तिच्या डोळ्यात पाणी येतं, तेव्हा ‘एवढी का सुपारी लागली ?’ असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. अरे, तिचं लग्न व्हायच्या आधी तिच्या बापाला सुपारी दिली असतीस तर आता सुपारी लागली म्हणायची वेळ आली असती का? पण याला लग्न नव्हतं करायचं तर कविता लिहायची होती. त्यामुळं कवितेत सुपारीकुळाचा उद्धार झाला. हिंदू लिहून मराठी साहित्यात अडगळ निर्माण केलेल्या भालचं्र नेमाडे यांनी एका कवितेत ‘तंबाखू खाण्यासाठी मजबूत दात असोत जगावर थुंकण्यासाठी, सिगारेट पिण्यासाठी मजबूत फुप्फुसं..’ असं लिहिलंय. पण सुपारीची दखल घेतली नाही. आम्ही काय हिंदू नाही? की कवितेत स्थान मिळण्याएवढय़ा पॉप्युलर नाही? केशवसुत एवढे क्रांतिकारक कवी, त्यांनाही ‘एक सुपारी द्या मज आणून..’ असं नाही लिहावंसं वाटलं,
..
कवींनी उपेक्षेनं मारलं, पण गाणी लिहिणाऱ्यांनीही म्हणावी तशी कदर नाही केली. केळीचे सुकले बाग असूनिया पाणी असं लिहितात, पण पावसानं आमच्या बागा उद्ध्वस्त झाल्या त्याची कळ कुणाला आली नाही. रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना..लिहितात. सुपारीच्या बागेत ये ना..असं लिहिलं तर साल्यांची प्रतिभा विटाळेल काय? त्या तिकडं विदर्भ मराठवाडय़ातल्या दुष्काळी भागातल्या कवी-गीतकारांबद्दल काही बोलायलाच नको. दुसऱ्याच्या चंचीतले पान खायला, सुपारी चघळायला यांचा हात सदैव पुढे, पण सुपारीवर लिहायचं म्हटलं की यांचा प्रादेशिकवाद जागा होतो. पश्चिम महाराष्ट्राचा त्यांचा द्वेष कोकणाच्या वाटय़ालाही येतो. आम्ही काय त्यांचा सम्रु अडवून ठेवलाय? पण नाहीच लिहिणार. पण असं कुणी कोंबडं झाकलं म्हणून सूर्य संपावर जाणार आहे थोडाच ? खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली आता बाई सुपारी फुटली..केवढा धुमाकूळ घातला गाण्यानं. सुपारी घातल्यामुळं गाणं रंगलं, हे ध्यानात घ्यावं. गाणं रंगवायचं असलं तर कात-चुना नव्हे, सुपारी पाह्यजे.
..
अखिल भारतात ज्यांना सुपारी बहाद्दर म्हटलं जातं, पूर्वी बोरूबहाद्दर म्हटलं जायचं, त्या पत्रकार जमातीबद्दल चार-चौघात बोलावं बोलण्यासारखं काही नाही. सिग्रेटी फुंकतील. न चुकता बारमध्ये जातील. गुटख्याच्या पुडय़ांची माळ बाळगून तासातासाला तोंडात पुडय़ा रिकामे करणारे रिपोर्टरकमऑपरेटरकमपेजडिझायनरकमजमलेतरसबएडिटरमाप आहेत. त्यात सुपारी घेणाऱ्यांची कमतरता नाही. पण सुपारी खाऊन माहीत असलेले कितीसे सापडतील? गेला तो जमाना, जेव्हा एक्सप्रेस टॉवरमध्ये सुपारी खाणं आणि चघळणंही कसं तारतम्यानं व्हायचं. ‘हालहडकी’ हे एका एशियाटिक सुपारीचं नाव आहे, आणि अरूण टिकेकर हे ती खाणाऱ्या संपादकाचं, हे आजच्या पिढीला कसं कळणार? शेवटी शेवटी त्यांचं लेखन एवढं जड होऊ लागलं, त्याला हालहडकी सुपारी कारणीभूत असल्याचं कळल्यामुळं एक्सप्रेसच्या मॅनेजमेंटनं कें्राशी बोलून कर्नाटकातून येणाऱ्या त्या सुपारीवर महाराष्ट्रात बंदी घालायला लावल्याची आठवण दिनकर रायकर पुढं कधीतरी एखाद्या दिवाळी अंकासाठी लिहिणार आहेत, असं कानावर आहे.
..
कवी, गीतकार, पत्रकार ही सगळी कृतघ्न मंडळी. परंपरेचा अभिमान नाही. संस्कृती जोपासण्याची समज नाही. सगळे नुसते लिहून उत्सव साजरा करणारे. प्लेटॉनिक लव्ह करून पोरं थोडीच होतात? त्यापेक्षा राजकारणी बरे. थेट कृतीवर भर. काळ कितीही बदलला तरी सुपारीची बरकत त्यांच्यामुळंच टिकून राहिलीय. एकेकाळी अंडरवर्ल्डशी संबंधामुळं अंधाऱ्या कोठडीत खितपत पडलेलं आमचं जिणं राजकारणी मंडळींनी बाहेर काढलं. इथं खून खराबा नाही. अंधारकोठडी नाही. आपल्यामुळं कुणाला थर्ड डिग्री नाही. जो आदर्श वागणार नाही, त्याचीच सुपारी देणार आणि पुन्हा कवी गीतकारांसारखं ‘दिल्या घेतल्या सुपारीची शपथ तुला आहे..’असंही रडगाणं गाऊन शपथेच्या बंधनात अडकवणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर