पवार आणि मुंडे

शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचे वाढदिवस बारा डिसेंबरला मोठय़ा झोकात साजरे करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकाशी बांधिलकी मानून काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि मुंडे यांची ओळख आहे. दोघेही सध्या दिल्लीच्या राजकारणात आहेत. दोघांची तुलना करणे तसे कठिण आहे. तुलना केली तर त्यातून मुंडेंना पवाराच्या जोडीला आणून त्यांचे मोठे डिजिटल पोस्टर बनवल्यासारखे किंवा पवारांना मुंडेंच्या पातळीवर आणणेही योग्य ठरणार नाही. कट्टर राजकीय विरोधक असले तरी दोघांच्याही वाटचालीत काही परस्परपूरक बाबी आहेत.
शरद पवार हे काँग्रेस आणि गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित राहिले. दोघांचाही प्रवास राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून झाला, परंतु शरद पवार यांनी दोन वेळा राष्ट्रीय पक्षाविरुद्ध बंड पुकारून स्वत:ची वेगळी वाट चोखाळली आणि आज स्वत:च्या वाटेवरून मार्गक्रमण करीत आहेत. मुंडे यांनी मात्र पक्षाच्या छत्रछायेखालीच आपला प्रवास सुरू ठेवला, त्यातही प्रमोद महाजन यांच्यासारखा गॉडफादर पक्षात होता, तोर्पयत महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व त्यांच्याकडे राहिले. महाजन यांच्या मृत्युनंतर मात्र मुंडे पक्षात एकाकी पडले. फारच मानहानी होऊ लागली तेव्हा सर्व पदांचा राजीनामा देऊन बंडाचा पवित्रा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक त्यातही पुन्हा कोणतीही सार्वत्रिक निवडणूक न लढवलेले असे नितिन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आशीर्वादाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि त्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मुंडेंवर आली. मात्र मुंडे हा पक्षाचा बहुजन चेहरा असल्यामुळे त्यांना थेट दुखावण्याची भूमिका कुणी घेऊ शकत नाही. काळाची पावले ओळखून अलीकडच्या काळात ओबीसींचे संघटन करण्याच्यानिमित्ताने मुंडे यांनी तेवढे उप्रवमूल्य स्वत:पाशी गोळा करून ठेवले आहे. त्याच बळावर ते आज पक्षात सन्मानाचे स्थान टिकवून आहेत.
शरद पवारांचा राष्ट्रीय राजकारणातील थेट सहभाग दोन दशकांपासूनचा असला तरी पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे नेटवर्क तगडे आहे. देशभरातील बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री आणि अन्य बडय़ा नेत्यांशी त्यांचा दोस्ताना आहे. त्याअर्थाने राष्ट्रीय राजकारणातला त्यांचा वावर तीन दशकांचा आहे. पवार काँग्रेसमध्ये असते तर त्यांना हे स्थान मिळवता आले नसते. काँग्रेसमधून बाहेर पडून डावे, समाजवादी आणि जनसंघवाल्यांची मोट बांधून त्यांनी पुलोदचा प्रयोग केला, त्यामुळे यशवंतरावांच्या या मानसपुत्राला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. याच प्रयोगाला खंजिराचा प्रयोग असे महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जात असल्यामुळे पवारांना त्याची किंमतही चुकवावी लागली. काँग्रेसमधील त्यांचे निष्ठावंत मित्र आजही खंजिराच्या आठवणी काढीत स्वत:चा उत्कर्ष साधून घेतात. काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांची रोजी-रोटी टिकवण्यात पवारांचा मोठा वाटा आहे. आज तशी परिस्थिती दिसत नाही, परंतु केवळ पवारांचे विरोधक या एकाच क्वालिफिकेशनवर अनेकांनी दिल्लीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान टिकवून ठेवले.
पवार आणि मुंडे यांचे राजकारण परस्परपूरक आहे, असे म्हणताना मुंडेंचा तडफेचा काळ लक्षात घ्यावा लागतो. छगन भुजबळ शिवसेना फोडून काँग्रेसमध्ये आल्यानंतर शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे गेले आणि गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले. विरोधी पक्षनेतेपदामुळे मुंडे यांच्या नेतृत्वाला संधी मिळाली. महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्यामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात कारणीभूत असला तरी मुंडे यांनी संघर्षयात्रा काढून उठवलेले रानही तेवढेच महत्त्वाचे होते. या संघर्षयात्रेमध्ये मुंडे यांनी राजकारणी आणि गुन्हेगारांच्या संबंधांचा मुद्दा घेतला आणि त्याचा रोख थेट शरद पवार यांच्यावर ठेवला. पवार यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याची वातावरणनिर्मिती करण्यात मुंडे यशस्वी झाले. या हल्ल्याने पवारांना पुरते घायाळ केले आणि मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्या रांगेतील नेत्यांमध्ये विराजमान झाले.
पवार आणि मुंडे दोघेही ग्रासरुट लीडर आहेत. मात्र पवारांचा पाया जेवढा पक्का आहे, तेवढा मुंडेंचा नाही. लोकसभा किंवा विधानसभेची बारामतीची निवडणुक ही औपचारिकता असते, एवढे पवारांचे मतदारसंघावर वर्चस्व आहे. याउलट मुंडे यांना निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचा इतिहास आहे. किंबहुना रेणापूरमधून विलासराव देशमुख यांच्या मदतीशिवाय निवडून येणे त्यांच्यासाठी अवघड असायचे. असे असले तरी ते रेणापूरमधून सातत्याने निवडून आले आणि गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून मोठय़ा मताधिक्क्य़ाने विजयी झाले. मुंडे यांच्या एकसष्ठी समारंभात त्यांचा गौरव करताना पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते की, ‘मुंडे यांच्यामुळे भाजप सर्वसामान्यांर्पयत पोहोचला.’ गौरव समारंभात लोक काहीही बोलत असतात, तशा प्रकारचे हे विधान नव्हते. अडवाणींनी वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला. बनियांचा आणि पांढरपेशांचा पक्ष असलेल्या भाजपला मुंडे यांच्यामुळे समाजाच्या विविध थरांमध्ये जागा मिळाली. मंडल आयोगाचे आंदोलन पेटले होते, तेव्हा भाजपने राममंदिर बांधण्याच्या उन्मादात मंडलविरोधी भूमिका घेतली होती, शिवसेनेनेही मंडलला विरोध केला होता. मात्र महाराष्ट्रात मुंडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने मंडल आयोगाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. भाजपच्या भावनेच्या लाटेला बांध घालण्याचे काम अनेकदा मुंडे यांनी केले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे गणपतीला दूध पाजण्याच्या कार्यक्रमात सामील झाले असताना उपमुख्यमंत्री असलेल्या मुंडे यांनी मात्र हे थोतांड आणि अंधश्रद्धा असल्याचे सांगून विज्ञाननिष्ठ भूमिका घेतली होती. शिवसेना कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ‘वडिलांना शिव्या दिल्या तर राग येणारच’ असे विधान करून राजधर्माला तिलांजली दिली, मात्र मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन राजधर्माचे पालन केले होते. भारतीय जनता पक्षासारख्या मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या पक्षात राहूनही आपली उदारमतवादी प्रतिमा जपण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला.
शरद पवार साठीच्या उंबरठय़ावर पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र दुर्दैवाने त्यांना तिथर्पयत मजल मारता आली नाही. भविष्यात त्यांना तशी संधी मिळेल याची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. पंतप्रधानपद हे अर्थात मूल्यमापनाचे परिमाण होऊ शकत नाही. पात्रता असूनही पंतप्रधानपद न मिळालेल्या लोकांची अनेक नावे सांगता येतात, तसेच पात्रता नसताना हे पद मिळालेल्यांचीही नावे सांगता येतात. मात्र गेल्या दोन वर्षातील पवारांची वाटचाल त्यांच्या समर्थकांनाही गोंधळात टाकणारी आहे. त्यांनी क्रिकेटची आवड जोपासावी की कुस्ती फेडरेशनचे काम करावे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु या एक्स्ट्रा करिक्युलम अ‍ॅक्टिव्हिटींमुळेच ते कृषी खात्याला न्याय देऊ शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित असलेले हे खाते कें्रातले ग्लॅमर नसलेले खाते होते, पवारांच्यामुळे हे खाते चर्चेत आले. परंतु क्षमता असूनही पवारांना या खात्यावर छाप पाडता आली नाही. त्यांनी फक्त कृषी खात्याला योग्य दिशा दिली असती तरी कोणत्याही पंतप्रधानापेक्षा देशाने त्यांना लक्षात ठेवले असते, परंतु तसे होऊ शकले नाही, हे पवारांचेही दुर्दैव आणि देशाचेही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर