सांस्कृतिक मांडवात उपरे राजकारण
अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे सूप वाजले आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले. तसे पाहिले तर नाटय़ संमेलन आणि साहित्य संमेलनाचा परस्परांशी संबंध नाही , तो असता तर दोन्हीं घटकांसाठी अधिक उपयुक्त ठरले असते. परंतु आपापल्या वकुबानुसार आपापल्या राहुटय़ांवर राज्य करायचे , असे सनातन संगनमत असल्याप्रमाणे दोन्हीकडची मंडळी परस्परांपासून सुरक्षित अंतर ठेवतात. नाटकवाली मंडळी साहित्य संमेलनात आली तर साहित्यिकांभोवतीची गर्दी त्यांच्याभोवती जमेल आणि साहित्यिक , समीक्षक नाटय़संमेलनाकडे गेले तर नाटकवाल्यांच्या मर्यादा उघडय़ा पडतील , असे काहीतरी असावे. त्यामुळे साहित्यिक नाटकापासून आणि नाटकवाले साहित्य संमेलनापासून फटकून राहतात. संमेलनांच्या निमित्ताने राजकीय मंडळींची उपस्थिती हा विषय दरसाल चर्चेत येत असतो. विशेषत: साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्याची अधिक चर्चा होत असते. यंदा नाटय़संमेलनाच्या काही आठवडे आधी रत्नाकर मतकरी सांगलीत एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांची लुडबूड असू नये , अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मतकरी हे साहित्य आ...