महाराष्ट्राची साहित्य अकादमी

‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि भाषिक राज्याच्या निर्मितीनंतर, वैचारिक व सांस्कृतिक पुनरुज्जीवन घडवून आणणारा एक शक्तिशाली नवा प्रवाह भारतीय जीवनात निर्माण झाला असून आपण एका समृद्ध अशा कालखंडात प्रवेश करीत आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकजीवन समृद्ध करण्याची जी प्रतिज्ञा देशाने केली तिचाच हे पुनरुज्जीवन एक भाग असून भाषिक राज्यांच्या निर्मितीमुळे या पुनरुज्जीवनाच्या कार्यासाठी आम्हाला एक नवे साधन प्राप्त झाले आहे. यापुढे आता एक निश्चित कालखंड सुरू होत असून या क्षेत्रात घेतलेल्या जबाबदाऱ्या आपण पुऱ्या केल्या पाहिजेत. या जबाबदाऱ्या स्पष्ट करून त्या पार पाडण्यासाठी निश्चित अशी यंत्रणा आपण तयार केली पाहिजे, असे मला वाटू लागले आणि त्यातूनच या मंडळाची कल्पना निर्माण झाली. साहित्य अकादमी ही अशाच प्रकारची संस्था असून ती साली अस्तित्वात आली. वेगवेगळ्या भाषेतील दुर्मिळ ग्रंथ प्रसिद्ध करणे, इतिहासाचे, वाड्.मयाचे आणि निरनिराळ्या संस्कृतीचे संशोधन करणे यासारखे विविध स्वरुपाचे कार्य ही संस्था करीत असते. साहित्य अकादमीसारखेच व शक्य झाल्यास त्यापेक्षाही अधिक व्यापक स्वरुपाचे कार्य या मंडळाकडून व्हावे, या उद्देशाने हे मंडळ स्थापन करण्यात आले आहे.’
..
‘या मंडळाने कोठल्या प्रकारचे काम करावे, हे कोणत्या पद्धतीने करावे यासंबंधी कुठलेही बंधन, कुठलीही मर्यादा शासन या मंडळावर घालू इच्छित नाही.’
..
‘हे मंडळ वेगवेगळ्या भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन करणारे प्रकाशन खाते व्हावे, असे नव्हे. तर एक प्रकारचे सर्जनशील आणि विचार करणारे हे मंडळ पॉवर हाऊस बनावे, विद्युतगृह बनावे, अशी या मंडळासंबंधीची माझी अपेक्षा आहे. हे मंडळ महाराष्ट्राचे जीवन व्यापक, विस्तृत व क्रियाशील करणारे माध्यम बनावे अशी माझी त्याबद्दलची कल्पना आहे.’
..
महाराष्ट्र सरकारने 19 नोव्हेंबर 1960 रोजी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या भाषणातील ही अवतरणे आहेत. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणि मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन आणि प्रकाशन यांना उत्तेजन देणे हा मंडळाचा मुख्य उद्देश होता.
यशवंतरावांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्यात मंडळाला कितपत यश आले? मंडळाच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीकडे बारकाईने पाहिले अनेक बाबी दिसून येतात. भाषा-संस्कृतीच्या क्षेत्रात मंडळाने केलेले काम मोठे आहे, परंतु मंडळ मार्केटिंगमध्ये कमी पडले.
नवलेखक अनुदान योजना ही मंडळाची एक महत्त्वाची योजना आहे. परंतु साहित्य क्षेत्रातील बडय़ा धेंडांनी अनुदानाची खिरापत म्हणून या योजनेची सतत टवाळी केली आणि साहित्य संस्कृती मंडळ म्हणजे केवळ नवलेखकांना पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान देणारे मंडळ अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली. या योजनेतून काही सुमार पुस्तके निघाली. परंतु ज्या काळात ही योजना सुरू झाली त्या काळाच्या पातळीवर विचार केला तर त्या पुस्तक निघण्याचे महत्त्व लक्षात येईल. पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायाचा आज मोठा विस्तार झाला असून कुणीही आपले पुस्तक स्वखर्चाने प्रकाशित करू शकतो. किंवा प्रकाशकही सुमार पुस्तकांची रद्दी छापत असतात. परंतु पंचवीसेक वर्षापूर्वीचा काळ विचारात घेतला तर पुस्तक प्रकाशित करण्याबाबत कमालीचे अज्ञान होते. त्या काळात मंडळाने अनेक हस्तलिखितांना छापील अक्षरांचे भाग्य मिळवून दिले. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातील खेडय़ापाडय़ातील लेखकांची पुस्तके या योजनेत प्रसिद्ध झाली. साहित्य क्षेत्रात प्रस्थापित बनलेल्या अनेक साहित्यिकांचे पहिले पुस्तक तसेच अनेक महत्त्वाची पुस्तके मंडळाने प्रसिद्ध केली आहेत. उदाहरणादाखल नावेच घ्यायची तर प्रतिमा इंगोले, आनंद नाडकर्णी, वाहरू सोनावणे, उर्मिला पवार, संजय पवार, लालू दुर्वे, इं्रजित भालेराव, द. भा. धामणस्कर, सुकन्या आगाशे, विश्वनाथ शिंदे, रामचं्र पठारे, नीरजा, अरुण काळे यांची घेता येतील. शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे ‘माझ्या जल्माची चित्तरकथा’ किंवा बेबी कांबळे यांचे ‘जिणं आमचं’ ही पुस्तके मंडळाच्या अनुदानातूनच प्रसिद्ध झाली आहेत. याशिवाय मंडळाने नवलेखकांना मार्गदर्शनासाठी पासून कार्यशाळा घेतल्या जातात. नव्याने लिहिणाऱ्यांना दिशा देण्यामध्ये या कार्यशाळांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून आजचे अनेक नामवंत लेखक या उपक्रमाचा कृतज्ञतेने उल्लेख करतात. मंडळाने अनेक महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पीस’ चा संक्षिप्त मराठी अनुवाद, पाश्चात्य रोगचिकित्सा, रस-भाव विचार, धर्मशास्त्राचा इतिहास, नामदेव गाथा, एकनाथी भागवत, कौटिलीय अर्थशास्त्र, भाषाशुद्धी, आगरकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट आदींचे समग्र वाड्.मय अशा विविध विषयांवरील ग्रंथांचा त्यात समावेश आहे. अण्णाभाऊ साठे यांचे समग्र वाड्.मय अवघ्या रुपयांत मंडळाने उपलब्ध करून दिले. त्याआधी महात्मा जोतिराव फुले यांचे समग्र वाड्.मयही अल्प किंमतीत उपलब्ध करून दिले, त्याच्या खरेदीसाठी अक्षरश: रांगा लागल्या होत्या. वाड्.मयकोश, शब्दकोश तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान कोशांची निर्मिती हे मंडळाचे मोठेच योगदान आहे. मंडळावर आणि मंडळाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना या बाबी विचारात घेतल्या तर संबंधितांच्या टीकेची धार आपोआप कमी होईल. विश्वकोशाची निर्मिती ही साहित्य संस्कृती मंडळानेच सुरू केली आणि बऱ्याच कालावधीने विश्वकोश मंडळ वेगळे करण्यात आले, हेही लक्षात घ्यावे लागते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या प्रकांड पंडिताकडे मंडळाचे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यामागे यशवंतरावांची दूरदृष्टी होती. तर्कतीर्थानी मंडळाची घडी बसवली आणि दिशाही दिली. अर्थात मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्त्या राजकीय पातळीवर होत असल्यामुळे काहीवेळा वादही निर्माण झाले. एका पुस्तकावरून अकारण वाद निर्माण केल्यामुळे प्राचार्य रा. रं. बोराडे यांना मनस्ताप सहन करावा लागला. परंतु बोराडे यांच्या काळातच मंडळाच्या कारभाराला खऱ्या अर्थाने शिस्त आली, हे लक्षात घ्यावे लागते. त्यानंतर मधु मंगेश कर्णिक यांनी मंडळ अधिक लोकाभिमुख बनवले. कर्णिक यांच्या काळातच मंडळाने उपक्रमांची व्याप्ती वाढवली, अनेक नवनवे उपक्रम सुरू केले. नव्या योजना आखल्या आहेत. शब्दकोश आणि विज्ञानकोशाच्या सीडी पासून ग्रामीण जीवन कोश, प्रमाण भाषा कोश, सणांचा कोश, बोलीभाषेचा प्रकल्प, मराठी शब्द व्युत्पत्ती कोश हस्तकलांचा माहिती कोश तयार करण्याबरोबरच वाचनसंस्कृती वाढीस लावण्यासाठीही काही उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. अन्य भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत आणण्याचे प्रयत्न आतार्पयत झाले आहेत,त्याला गती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठीतील दर्जेदार साहित्याचा अन्य भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे. हा प्रकल्प गांभीर्याने राबवला तर मराठी साहित्याच्या वैश्विकरणाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू होईल. साहित्य अकादमी ज्याप्रमाणे लेखकांना प्रवासासाठी अभ्यासवृत्ती देते, तशी अभ्यासवृत्तीही सुरू करण्यात येणार आहे. साहित्य संस्कृती मंडळाची प्रकाशने एवढी मौलिक आहेत, परंतु ती वाचकांर्पयत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. ही पुस्तके मिळवण्यासाठी शासकीय ग्रंथागारामध्ये जावे लागते. आणि शासकीय ग्रंथागारे मोजकीच आणि फारतर जिल्ह्याच्या ठिकाणी, तीही गावाबाहेर असल्यामुळे लोक तिथर्पयत जात नाहीत, परिणामी मौलिक पुस्तके धूळ खात पडतात. बदलत्या काळात व्यावसायिक पद्धतीने या प्रकाशनांचे वितरण करण्याचा मार्ग चोखाळला पाहिजे. कुठल्याही पुस्तकाच्या दुकानांतून ती उपलब्ध झाली तरच अधिकाधिक वाचकांर्पयत पोहोचतील. आगामी काळात सरकारी बंधने ओलांडली तर मंडळ खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आणि वाचकाभिमुख होईल. साहित्य अकादमीचे नाव ज्या आदराने घेतले जाते, त्याच आदराने साहित्य संस्कृती मंडळाचे नाव घेतले जाईल. महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक विश्वाचे नेतृत्व मंडळाकडे येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर