कंदिलाचे दिवस

‘जत्रा’ साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा प्रा. व. बा. बोधे यांची धारावाहिक कादंबरी हा त्यातील वाचकप्रिय भाग होता. त्यांच्या या कादंबरीसाठी काढलेली चित्रे दिलखेचक असायची. कादंबऱ्या वरकरणी साप्ताहिकाच्या प्रकृतीला साजेशा, थोडय़ाशा श्रंगारिक वळणाने जाणाऱ्या असाव्यात असे चित्रावरून वाटायचे. आणि वाचक त्याकडे वळायचा. मात्र प्रत्यक्षात या कादंबऱ्यांमध्ये गावकुसाबाहेरच्या भटक्यांच्या जगण्याचं चित्रण असायचं. त्यात कधी एखादी प्रेमकहाणी यायची. ती प्रा. बोधे यांच्या शैलीने अशी काही खुलवलेली असायची की वाचणारा त्यात अडकून जायचा. गोष्टीवेल्हाळ शैलीमुळे बोधे यांचे लिखाण कधी कंटाळवाणे वाटले नाही. आपल्या वाड्.मयीन संस्कृतीत लोकप्रिय लेखकाकडे काहीसे दुर्लक्ष केले जाते. बोधे यांनी ‘जत्रा’ मधून केलेले लेखन आणि त्यामुळे त्यांना मिळालेली लोकप्रियता यामुळे त्यांच्या साहित्याकडे समीक्षकांनी गंभीरपणे पाहिले नाही. कोणत्याही ग्रामीण साहित्यिकापेक्षा बोधे यांनी केलेले ग्रामजीवनाचे चित्रण अधिक प्रभावी आणि गावगाडय़ाला व्यापकपणे कवेत घेणारे आहे. गाव, गावगाडा, बलुतेदारी, दलित जीवन आणि गावाबाहेरच्या भटक्यांचे जगणे असे सगळे बोधे यांच्या साहित्यात येते. मात्र बोधे कुठल्या साहित्यिकांच्या, समीक्षकांच्या किंवा चळवळीच्या कंपूत शिरले नाहीत. त्यामुळे त्यांचे साहित्य दुर्लक्षित राहिले. लोकप्रियता मिळाली तरी समीक्षकांची मान्यता मिळाली नाही. मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘कोकरउडय़ा’ हे आत्मचरित्रही अत्यंत वेगळ्या प्रकारचे असूनही त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही.
‘कंदिलाचे दिवस’ हे बोधे यांचे अलीकडील ललितगद्य. मराठीत ललितलेखन म्हणजे छोटय़ा छोटय़ा ललितलेखांचे संकलन असे स्वरुपाचे आहे. परंतु ललितगद्याची रूढ संकल्पना ओलांडून हे पुस्तक पुढे जाते. कादंबरीप्रमाणे एकाच विषयावरील दीर्घ ललितलेखनाचा हा प्रयोग त्याअर्थानेही वेगळा आणि वैशिष्टय़पूर्ण म्हणता येईल असा आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ग्रामीण जीवनाचे आणि लोकसंस्कृतीचे आरस्पानी दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. कंदिलाचे दिवस म्हणजे हरवलेल्या संपन्न ग्रामजीवनाचा कलात्मक शोध आहे. आज चाळिशीत असलेल्या किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या खेडय़ात वाढलेल्या कुणाही व्यक्तिला स्वत:चेच अनुभवविश्व वाटावे आणि त्यात हरवून जावे. कंदिलाच्या दिवसांच्या आठवणी ते खुलवून खुलवून सांगतात. या आठवणी सांगता सांगता खेडय़ातल्या जीवनावर मार्मिक भाष्य करतात. कंदिलाच्या दिवसांच्या आठवणी सांगताना स्वाभाविकपणे बोधे बालपणातल्या आठवणींमध्ये हरवून जातात. स्वत:चं घर. दार्रिय़ातल्या जगण्याचा संघर्ष, अडचणीच्या काळात एकमेकाच्या मदतीसाठी धावून येणारे साधे-भोळे गावकरी, समूहजीवनातला जिव्हाळा हे सारं येतं. ‘वाहत्या प्रवाहात चांदणं पडावं तसं पन्नास वर्षापूर्वीचं जगणं माझ्या रक्तवाहिन्यांत खोलवर पसरलं आहे. आजही तो ग्रामीण समाज मला लख्ख दिसतो. कंदिलाच्या प्रकाशातली लोकवर्तुळ मनाच्या गाभाऱ्यात जमा होत..अंधाराला मागे सारत झेपावणाऱ्या प्रकाशरेषा स्पष्ट दिसू लागतात..’ असं प्रारंभीच्या निवेदनात स्पष्ट करतानाच बोधे म्हणतात, ‘पन्नास वर्षापूर्वी गावागावात अंधार होता. पण माणसांची मनं प्रकाशाने तेजाळली होती. बापलेक प्रेमाने जगत. मायलेकीत अगत्य होतं. भाऊबहिणींत जिव्हाळा होता. घरांची आडी एकमेकांना बांधली होती. लेकरू जपल्यासारखं प्राण्यांना जपत. आता काळ बदलला. जगण्याची समग्र परिमाणं बदलली. प्रकाशाचे काचवर्तुळ हरवले. हे वर्तुळ फार लहान होते. पण सुखी होते. वर्तुळ विकसित झाले. माणसे हरवत गेली..’
अंधार पडला की घराघरात दिवे, कंदिल लावले जात. या कंदिल लावण्याचा सोहळा बोधे इतक्या तपशीलाने आणि बारकाव्यांनीशी सांगतात की, ते चित्र डोळ्यासमोर हुबेहुब उभं राहतं. ते लिहितात, ‘पूर्वी दिवा लावणं, कंदील लावणं हा सोहळा असायचा. जीवनाचे अनेक उन्हाळे, पावसाळे अंगावर झेललेल्या आईभोवती, आजीभोवती पोरी कोंडाळं करून बसत. मग राख यायची. फडकं यायचं. वात ढकलायला काडी यायची. रॉकेलची बाटली नि नाळकं यायचं. बाटलीची दोरीसुद्धा अंगाचा आकडा करून ताठ उभी राहायची. मग आई, आजी राखेनं काच घासायची. पोरी फडक्यानं कंदील पुसायच्या. कंदिलाचे खांदे, डोकं, कडी, काचेची जाळी काळजीपूर्वक पुसायची. मग आजीच्या हातातलं फडकं कंदिलावर पुन्हा फिरायचं. पोरींचे नाजूक हात काचेवर फिरत. काचेत डोळे घालून पोरी हसत..आजीच्या हातातलं काम हळुहळू पोरींच्या हातात जाई. प्रत्येक पोरगी प्रत्येक काम मन:पूर्वक करे. मग कंदिलात हळवार रॉकेल ओतलं जाई. शेजारचा दिवा अशावेळी उपयोगी पडे. दिव्याच्या पिवळ्याजर्द उजेडात चिमणे देह उजळून निघत. परकरी पोरींच्या चेहऱ्यावर वेगळी प्रभा फाके.’
कंदिलाबद्दल आणि कंदिलाच्या दिवसांबद्दल सांगताना बोधे दिव्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती देतात. दारावर पत्र्याचा करून घेतलेला दिवा, विकतची नाजूक चिमणी, सुं्री याबद्दल तपशीलवार सांगतात. प्रभाकर कंदिलाबद्दल सांगतात. लग्न समारंभात मिरवणाऱ्या मेंटल बत्तीभोवतीच्या गोष्टी रंगवून सांगतात. सांगता सांगता कधी आधुनिक संदर्भ देतात. विकत घेतलेल्या चिमणीच्या आकारासंदर्भात ते लिहितात, या चिमण्या मोठय़ा देखण्या असत. आकार फ्यूएल व्होडकाच्या बाटलीसारखा, वर निमूळता होत गेलेला..
कंदिलाचं अस्तित्व ठळकपणे जाणवायचं ते रानात. वस्तीवस्तीवर चमकणारा कंदिलाचा पिवळाधम्मक ठिपका कुठूनही नजरेत भरायचा..असं चित्रमय शैलीतलं वर्णन पुढे नेताना बोधे लिहितात, ‘ वीज नसलेला तो काळ. माणसं सुगीच्या दिवसांत रानामाळात वस्ती टाकत. खळं सारवून स्वच्छ करत. भाकरीचा नैवेद्य तिवडय़ाजवळ पुरत. कणसाच्या शेजऱ्यावर झोपत. बैलं जवळच बांधावरच्या झुडपांना गुंतवत. हिरवं कडवाळ बैलं चवीनं खात. अशावेळी एकुलता एक कंदील देवाच्या डोळ्यासारखा वस्तीवर जागत राहायचा.’
कंदिलाभोवतीच्या रानातल्या आठवणी, शाळेची कलापथकं, तमाशाचे फड, गावातल्या पारावरच्या गप्पा, नाटकाच्या रंगणाऱ्या तालमी, अभ्यासात जागणाऱ्या रात्री, अशा कितीतरी गोष्टींबद्दल बोधे गोष्टीवेल्हाळ सांगत राहतात. कंदील घेऊन खेकडी धरायला गेलेल्या आठवणी येतात. माळावरच्या भटक्यांच्या पालातला मिणमिणता दिवा आणि नंतरचे त्यांच्या अंधारभरल्या आयुष्याचं चित्रण करतात. कधी नर्मविनोदी शैली, कधी गोष्टीवेल्हाळ वर्णन कधी कधी तत्त्वज्ञानाच्या पातळीवरही जाते. गावात वीज आल्यानंतरच्या काळाबद्दल ते लिहितात, ‘माझ्या घरात वीज यायला तब्बल नऊ र्वष लागली. वीज आल्यानं एक झालं, दार्रिय आणखी स्वच्छ रुपात दिसायला लागलं. मधल्या अंधारयुगात चुलीवरच्या दिव्यानेच आम्हाला साथ दिली.’
दिव्याखालच्या अंधारातलं गावातल्या दार्रियाचं चित्र उभं करताना बोधे लिहितात, ‘घरात रॉकेलचा डबा बाळगणारे तुरळक श्रीमंत गावात होते. घरोघर रॉकेलची बाटलीच असायची. काळपटलेल्या जाड काचेच्या बाटलीली दोरी बांधलेली असायची. माणसं रॉकेलसुद्धा पुरवून पुरवून वापरत. काही बायका तर दिवा किंवा कंदील घेऊनच दुकानात जात. त्यात चार आण्याचं रॉकेल टाकून आणत. बाटलीभर रॉकेल घ्यायला पैसे तर हवेत. आहे त्या तुटपुंज्या संसारात कशातरी गरजा भागवायच्या. माझी आई तर चुलीतल्या जाळावरच प्रकाशाची गरज भागवायची. चुलीत चघळ सारायचं. जेवायला ताटं वाढायची. चार काटक्या एका हाताने चुलीत सरकवायच्या. त्या प्रकाशात जेवण उरकायचं.’
भूतकाळतले सारेच रम्य होते असे नाही, तर अनेक वाईट गोष्टीही होत्या. त्याबद्दल बोधे लिहितात, कंदिलाच्या दिवसांत सगळंच चांगलं होतं, असं मी म्हणणार नाही. तेव्हाही उलाढाली करणारे राजकारणी होतेच. फौजदाराला हाताशी धरून गावावर डोळे वटारणारे महाभाग होतेच. केवळ पायलीभर धान्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालणारी माणसं होती. इनामदाराने दिलेल्या एक किलो वांग्यासाठी भर दिवसा त्याला भोग देणाऱ्या बायका होत्या..
कंदिलाच्या भोवतालचे भावविश्व चितारतानाच बोधे खेडय़ातल्या बदलत जाणाऱ्या वास्तवाचे चित्रणही करतात. हे बदलते वास्तव इतके अस्वस्थ करणारे आहे की त्याबद्दल फक्त निरीक्षणे न नोंदवता आसूडासारखे फटकारे लगावतात. त्यामागची तळमळ आणि तगमग शब्दाशब्दातून जाणवते. बदलत्या वास्तवाने ते अस्वस्थ होतात.
वीज नसलेल्या काळातल्या अंधारयुगातल्या माणसांच्या मनातल्या उजेडाच्या गोष्टी सांगता सांगता ते वीज आल्यानंतर मनामनांत दाटलेल्या अंधाराचा समाचार घेतात. खेडय़ातल्या बदलत्या वास्तवाचा वेध घेताना केवळ आठवणी आणि गोष्टींपुरते मर्यादित न राहता चिंतनशील वृत्तीने बदलत्या काळाचा धांडोळा घेतात. राजकारणाने नासवलेल्या खेडय़ातल्या सामाजिक पर्यावरणाचा पोटतिडकीने वेध घेतात. दार्रिय़, अज्ञान आणि जन्मभर अखंड कष्टात होरपळूनही आपल्या संपन्न नैतिक जाणिवा जपणारा समाज या पुस्तकाच्या रुपाने प्रा. व. बा. बोधे यांनी अजरामर केला आहे. गेल्या पन्नास वर्षातले खेडय़ातले वास्तव जाणून घ्यायचे असेल तर ‘कंदिलाचे दिवस’ वाचायलाच हवेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर