कुंबळे नावाचा जादूगार !
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh0gs-dgpT6o9AF-ao94amAmvavER8gchWl_BP5SAZSgYwxkbSKLnpXlkuqcMWJlHu3FcgPQSOVYv99j6Rb9y1ikAXZrulvtPuALu-bLNDu6eBSxgIh19Wr5f1ZjVk2iaymVY7cH0a_E88A/s320/ANIL-KUMBLE.jpg)
क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, असं म्हटलं जायचं. परंतु तो भूतकाळ
झाला. कसोटी, साठ षटकांची वन डे, पन्नास षटकांची वन डे, टी-२० असं क्रिकेटचं विश्व
मर्यादित बनत गेलं तसतसा क्रिकेटमधला आक्रमकपणा वाढत गेला. किंबहुना आक्रमकपणा ही क्रिकेटच्या
मैदानावरची आवश्यक बाब बनली. पण आक्रमकतेच्या जोडीला शिवराळपणा आला. धंदेवाईकपणा आला.
आक्रमक तर अनिल कुंबळेसुद्धा होता. कुंबळे अपील जोरकस करायचा. एकदा तर खूप जोरात अपील
केलं म्हणून त्याला दंड भरायला लागला होता. पण ते तेवढंच आणि तेवढ्यापुरतंच. बाकी कुंबळे
म्हणजे सभ्य माणसांच्या खेळातला शेवटचा मालुसरा म्हणायला हवा. याचा अर्थ नंतरच्या काळातले
सगळे असभ्य आहेत, असा होत नाही. महेंद्रसिंग धोनीच्या ‘कूल’पणाला सभ्यता नाही म्हणता
येत. भारतीय संघाचा कर्णधार असलेला धोनी चेन्नईचा कर्णधारच अधिक शोभायचा. ड्रेसिंग
रूममध्ये आणि मैदानावरही त्यानं काही कमी राजकारण केलं नाही. कुंबळेला असा कोणताही
दोष लावता येत नाही. जागतिक क्रिकेटमधल्या सभ्यतेचा मसावि काढला तर त्यात अनिल कुंबळे
खूप वरच्या स्थानावर असेल.
सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कारकीर्द
जवळपास एकाचवेळी सुरू झाली. कुंबळेनंतर सचिन पुढं पाच वर्षे खेळत राहिला. नोव्हेंबर
२००८ मध्ये दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या
अखेरच्या दिवशी चहापानानंतर अचानक कुंबळेनं निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या अचानक
निर्णयानं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. त्यावेळी त्याला खांद्यावर उचलून घेऊन
सगळ्या खेळाडूंनी त्याचा सन्मान केला. क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या खेळाडूंचे निरोप
समारंभ अनेकांनी पाहिले असतील, परंतु असा हृद्य निरोप समारंभ कधीच नाही पाहण्यात आला.
कुंबळेच्या व्यक्तिमत्त्वातला सुसंस्कृतपणा त्यातून अधिक ठसला.
कुंबळेच्या कारकीर्दीवर दृष्टिक्षेप टाकताना भलीमोठी आकडेवारी सादर करता
येऊ शकते. एका डावात दहा बळी घेणारा जगातला दुसरा गोलंदाज, सर्वाधिक बळी घेणारा मुथय्या
मुरलीधरन (८००) आणि शेन वॉर्न (७०८) नंतरचा तिसरा (६१९) गोलंदाज,पाचशेहून अधिक बळी
घेणारा भारताचा एकमेव गोलंदाज इत्यादी इत्यादी. परंतु या आकडेवारीच्या पलीकडं कुंबळेनं
भारतीय क्रिकेटला खूप काही दिलं. क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या वाट्याला जरा जास्ती कौतुक
येत असतं आणि गोलंदाजाची उपेक्षा होत असते. कुणा फलंदाजानं शतकांचं रेकॉर्ड केलं असेल,
कुणी धावांचं रेकॉर्ड केलं असेल किंवा आणखी काही, परंतु कुंबळेच्या कारकीर्दीतील दीड
तपाच्या काळात भारतानं जे कसोटी सामने जिंकले, त्यातील सर्वाधिक सामने जिंकून देण्यात
अनिल कुंबळेचा वाटा आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याच्यासारखा मॅचविनर दुसरा
कुणी नाही. कुंबळे खेळत असतानाही अनेकदा भारतीय संघ कसोटी आणि वन डे मध्ये वाईट परिस्थितीतून
गेला. परंतु अशा वाईट काळातसुद्धा टीव्हीच्या स्क्रीनवर गोलंदाजी टाकणारा कुंबळे आश्वासक
वाटायचा. काही केलं तर हाच करू शकेल, असा विश्वास त्याच्याकडं बघून वाटायचा. आणि बहुतेकवेळा
कुंबळे हा विश्वास सार्थ ठरवायचा.
निवृत्तीनंतर इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या क्रिकेट कमिटीचा अध्यक्ष
म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा मेंटॉर
म्हणून त्याची नियुक्ती झाली. वर्षभरानंतर ते सोडून तो मुंबई इंडियन्सचा मेंटॉर बनला.
संघटनात्मक कामात झोकून देताना कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा तो अध्यक्ष बनला. त्याचे
सहकारी असलेले व्यंकटेश प्रसाद (उपाध्यक्ष) आणि जवागल श्रीनाथ (सचिव) यांच्यासोबत त्यानं
संघटनेत काम केलं. हा सगळा अनुभव त्याला प्रशिक्षक म्हणून काम करताना निश्चितच उपयोगी
पडेल. अनिल कुंबळे हा खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटमधला जादूगार होता आणि तब्बल अठरा
वर्षे त्यानं आपली जादू दाखवली. भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या भूमिकेत या जादूगाराचं
पुनरागमन झालंय. त्याच्या कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा