U. R. Ananthamurthy आणि मराठी पलायनवाद


कन्नड भाषेत लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक U. R. Ananthamurthy social networking साइट्सवर फेरफटका मारतात किंवा नाही, हे माहीत नाही. परंतु तिकडे ते थोडेसे डोकावले तरी आपल्याविरोधात जनभावना किती प्रक्षुब्ध आहेत, हे त्यांना दिसून येईल. खरेतर त्यातल्या अनेकांना U. R. Ananthamurthy यांचे नावगावपत्ता ठावठिकाणा माहीत नाही. नाहीतर केव्हाच त्यांची गठडी वळून विमानातून त्यांचे पार्सल सातासमुद्रापार रवाना केले असते. अनंतमूर्ती यांनी जो प्रमाद केला आहे आणि ज्या व्यक्तिविरोधात आवाज उठवला आहे, त्या व्यक्तिच्या समर्थकांच्या भावना म्हणजे नुसत्या ठिणग्या असतात. मोदींना पंतप्रधान करण्याच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांची मने एवढी प्रज्वलित झाली आहेत, की कधीही भडका उडून त्यात अनंतमूर्तींसारखे अनेकजण भस्मसात होऊन जातील. आजच अनेक मोदी समर्थकांनी भारतातून बाहेर जाणाऱ्या एकतर्फी विमानतिकिटाचे पैसे वर्गणीद्वारे अनंतमूर्तींना मनीऑर्डरद्वारे पाठवले आहेत. चुकून माकून मोदी पंतप्रधान झाले, तर विचारायलाच नको. अनंतमूर्तींसारख्या शंकडो विचारवंतांची गठडी वळून हे समर्थक विमानात कोंबतीलच, पण पुढे वाटेत समुद्रातही फेकून द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत.

मुळात अनंतमूर्ती नेमके काय बोलले, ते समजून घेण्यासारखे आहे. त्यांचे मूळ वक्तव्य असे आहे : ‘नरेंद्र मोदीच्या राजवटीत माझ्यासारख्याला जगणे अशक्य आहे. तरुणपणात मी नेहरूंवरही टीका करत होतो, परंतु त्यांच्या समर्थकांनी कधी आमच्यासारख्यांवर हल्ला केला नाही. त्यांनी आमच्या मताचा नेहमी आदर केला. जर्मनीमध्ये हिटलरच्या काळातील फॅसिस्टांसारखे मोदींचे समर्थक वागत आहेत. ज्या खुर्चीवर बसून नेहरूंनी देश चालवला, त्याच खुर्चीत मोदींसारख्या व्यक्तिला पाहण्याची माझी इच्छा नाही. आता माझे वयही खूप झाले आहे आणि प्रकृतीही साथ देत नाही. जर मोदी पंतप्रधान झाले तर तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का असेल. माझ्यासारख्याला जगणेच अशक्य होईल.’
या विधान प्रसिद्ध झाल्यानंतर अनंतमूर्तींच्यावर मोदीसमर्थकांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत अनंतमूर्ती यांनी आपल्या विधानाच्या अनुषंगाने काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. ‘जयप्रकाश नारायण यांच्या काळात सत्तेवर आलेल्या जनता पक्षाला (ज्यामध्ये जनसंघही होता) आपण समर्थन दिले होते.’ असे स्पष्ट करून त्यांनी म्हटले आहे की, ‘आपण समाजवादी असून आयुष्यभर काँग्रेसविरोधक राहिलो, परंतु आजच्या काळात बिगरभाजपी असणे हे बिगर काँग्रेसी असण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. ’
त्यांनी मुलाखतीत आणखी एक बाब नोंदवली आहे. ते म्हणतात, ‘ मी इंदिरा गांधी यांचा कठोर टीकाकार होतो, किंबहुना मी त्यांच्याविरोधात प्रचारही केला आहे. परंतु भाजपचे समर्थक आता ज्याप्रमाणे मला शिविगाळ करताहेत, तशा प्रकारची शिविगाळ काँग्रेसवाल्यांनी कधीही केली नाही.’
अनंतमूर्ती यांनी दोन संस्कृतींमधील फरक स्पष्टपणे नमूद केला आहे. आणि मोदी पंतप्रधान बनले तर स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या माणसाला जगणे कसे कठिण होणार आहे, हे मोदींच्या समर्थकांनी आताच दाखवून दिले आहे.
अनंतमूर्ती यांच्या विधानाच्या निमित्ताने मराठी साहित्य आणि विचारविश्वाची चर्चा करणेही आवश्यक आहे. कारण जेव्हा जेव्हा राज्यात, देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्यासंदर्भातील मुद्दे उपस्थित झाले तेव्हा तेव्हा मराठी साहित्य आणि विचारविश्वाने पलायनवादी भूमिका स्वीकारली. अनंतमूर्तींच्या शब्दांत सांगायचे तर साहित्यिकाला समाज आणि राजकारणापासून वेगळे करणे कठिण असते. मराठीत मात्र तसे दिसत नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने खूप राजकारण करता येते. पुरस्कारांसाठी लॉबिंग करतानाही जातीय, प्रादेशिक राजकारणाचे वावडे नसते. सरकारी कमिट्यांवर वर्णी लावून घेण्यासाठी राजकारण्यांपुढे लाचारी करणेही वर्ज्य नसते. परंतु सामान्य माणसांपुढचे, समाजापुढचे, देशापुढचे जळते प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा सोयीस्कररित्या पलायनवादी भूमिका स्वीकारली जाते.
विजय तेंडुलकर यांनी दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींना गोळी घालण्यासंदर्भातील विधान केले होते, तेव्हा किती मराठी साहित्यिकांनी तोंड उघडले होते ? आपण त्या गावचेच नसल्यासारखे सगळे गप्प राहिले होते. रंगनाथ पठारे यांच्यासारखे चार-दोन लोकच तेंडुलकरांच्या समर्थनार्थ पुढे आले होते. काही प्रसारमाध्यमांनी काही लेखकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा अनेक लेखकांनी, ‘तेंडुलकरांनी असा आततायीपणा करू नये’, असा सल्ला दिला होता. जणूकाही तेंडुलकर गोळी घालण्यासाठी मोदींना शोधत फिरत होते. त्यावेळी गृहराज्यमंत्री असलेल्या कृपाशंकर सिंह यांनी, ‘तेंडुलकरांना रिव्हॉल्व्हरचे लायसन्स दिले जाणार नाही’, असे सांगूनएका गंभीर मुद्द्याचा भीषण विनोद बनवला होता. ‘संतसूर्य तुकाराम’ कादंबरीवरून आनंद यादव यांच्याविरोधात वारकऱ्यांनी झुंडशाही वृत्तीचे प्रदर्शन केले, तेव्हाही मराठी साहित्यिक गप्प राहिले. संमेलनाच्या तोंडावर यादवांनी राजीनामा दिल्यानंतर सगळे जागे झाले आणि निषेध नोंदवू लागले. पण त्याआधी पंधरा दिवस सगळा तमाशा सुरू होता तेव्हा कुणी तोंड उघडले नव्हते. गेल्यावर्षी चिपळूणच्या संमेलनात परशुरामाचा वाद उद्भवला तेव्हाही संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोयीस्कर मौन पाळले होते.
भूमिका घ्यायचीच नाही, कारण भूमिका घेणे म्हणजे जोखीम असते आणि ती जोखीम घेण्याची तयारी असलेले फार कमी लोक असतात. अनंतमूर्ती यांच्या विधानानंतर डॉ. यशवंत मनोहर, मुकुंद टांकसाळे यांनीच प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मुळात अनंतमूर्ती यांचे विधान, त्याचा आशय लक्षात न घेता प्रसारमाध्यमांनी मोडतोड करून जी मांडणी केली, तीच समोर ठेवून सगळे त्यांच्यावर तुटून पडले. मोदीसमर्थकांनी त्यांच्यावर शिव्यांचा वर्षाव केलाच. परंतु आंबेडकरी अनुयायांनीही अनंतमूर्ती यांचे वक्तव्य जसेच्या तसे घेऊन ते घटनाविरोधी असल्याचे म्हटले. अर्थात ते मुद्द्याला धरून आणि चर्चेला प्रवृत्त करणारे होते. त्या मुद्द्याच्या अनुषंगाने अनंतमूर्तींच्या विरोधात झालेली मांडणी चुकीची म्हणता येणार नाही. कुठल्याही मुद्द्यावर चर्चा, वादविवाद होणे गरजेचे असते. अशा घुसळणीतूनच अनेक नवे मुद्दे पुढे येतात. अनेकांना स्वतःला दुरुस्त करता येते. अनंतमूर्ती यांचे विधान घटनाविरोधी असल्याचा गैरसमज ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी खोडून काढला. तेंडुलकरांनी मोदींसंदर्भात वक्तव्य केले तेव्हा तेंडुलकरांच्या समर्थनार्थ मराठी लेखक उभे राहिले नाहीत, ही वेदना यशवंत मनोहर यांच्या उरात होती. ते स्वतःही त्यावेळी व्यक्त व्हायचे राहून गेले होते. अनंतमूर्ती यांचे विधान आणि त्यावरील गदारोळानंतर ते तातडीने पुढे आले आणि अनंतमूर्तींच्या मुखाने घटनाच बोलत असल्याचे सांगून अनंतमूर्तींचे वक्तव्य घटनाविरोधी नसल्याचे स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय घटनेच्या आडून अनंतमूर्तींवर टीका करण्याचे दार त्यामुळे आपोआप बंद झाले आहे. अनंतमूर्ती यांच्या विधानानंतरच्या प्रतिक्रिया म्हणजे, मोदी सत्तेवर आले तर त्यांचे समर्थक कसे वागतील याचा trailor होता. तो cinema कधीच पडद्यावर येऊ नये, अशी अनंतमूर्ती आणि त्यांच्या विचाराच्या लोकांची मनोमन इच्छा आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर