पृथ्वीराजांचा आसूड !

साहित्य समेलनाच्या अखेरच्या दिवशी समारोप समारंभात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आसूड कडाडला आणि अवघे मराठी सारस्वत थरारून गेले. यापुढे भाषा आणि साहित्य व्यवहारात सरकारशी जपून व्यवहार करावा, लागेल याचीच जाणीव साहित्य व्यवहारातील कारभाऱ्यांना झाली. नथुराम गोडसेच्या नावाचा वाद उद्भवल्यानंतर मुख्यमंत्री साहित्य संमलनाच्या समारोपाला येणार किंवा नाही याबाबत सर्वानाच उत्सुकता होती. ठाण्यातील काँग्रेसच्या एका गटाने तर त्यांना निवेदन देऊन संमेलनाला येऊ नये, अशी विनंती केली होती. असे असूनही मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेल्या निमंत्रणाचा मान राखून संमेलनाला हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा लाभ घेऊन महामंडळाने भिक्षेकरी वृत्तीचे दर्शन घडवत स्वत:च्या पदाधिकाऱ्यांसाठी सरकारी मंडळांवर प्रतिनिधित्वाची आणि घटकसंस्थांच्या अनुदानवाढीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांची दखलही घेतली नाही, आश्वासन तर दूरच राहिले. नथुराम गोडसेच्या वादाचा थेट नामोल्लेख टाळून त्यांनी साहित्य संमेलनाचे संयोजक आणि महामंडळाचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग समाजाचा बुद्धीभेद करण्यासाठी केला, तर त्याचा तीव्र निषेधच होईल आणि संमेलनाच्या व्यासपीठावर यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असे सुनावले. संमेलनाच्या समारोप समारंभात पृथ्वीराज चव्हाण यांचा हा आसूड कडाडला, तेव्हा सारा सभामंडप स्तब्ध झाला. एरव्ही राजकीय नेते अशा संमेलनाला उपस्थित राहतात तेव्हा तुझ्या गळा माझ्या गळा असा गुडीगुडी व्यवहार पाहायला मिळतो. साहित्यिकांनी सरकारला मार्गदर्शन करावे, वगैरे भंपक विधाने केली जातात. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी महात्मा फुले यांनी दाखवलेल्या मार्गाने पुढे जाण्यातच हित असल्याचे प्रतिपादन करून फुल्यांच्या सत्यधर्माचे आचरण हाच खरा मार्ग असल्याचे स्पष्ट केले. टेक्नोक्रॅट पृथ्वीराज चव्हाण मराठी भाषेच्या अनुषंगाने काही तांत्रिक ऊहापोह करतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी थेट वैचारिक दिशाच स्पष्ट केल्यामुळे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. प्रारंभापासून मराठीत व्यवहार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्याकडे येणाऱ्या तालिकेवरील अभिप्रायही मराठीत असावेत, अशा सूचना दिल्या असल्याचे सांगून सरकारचे सर्व व्यवहार मराठीत होतील, याची ग्वाही दिली. त्याचबरोबर केवळ शासन निर्णय काढून आणि दुकानांच्या पाटय़ा मराठीत करून मराठीला उर्जितावस्था येणार नाही, तर मराठी ही जीवनशैली आणि श्वास बनला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन केले. सुमारे तीसेक वर्षापूर्वी पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने साहित्य व्यवहारावरील मक्तेदारीचे दावा केला होता, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना ‘साहित्य ही कुठल्या वर्गाची नक्तेदारी नाही’ अशा भाषेत समज दिली होती. आणि आज पृथ्वीराज चव्हाण यांनी यशवंतरावांचे स्मरण करीतच साहित्य महामंडळाला समज देऊन पुन्हा एकदा कृष्णेचे पाणी दाखवले !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर