नकुसा नव्हे लाडकी…

लातूर जिल्ह्यातील चाटा गावातील प्रीतीलता सुरवसेला परवा युनिसेफ आणि सह्या्री वाहिनीच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या नऊ बालिकांचा सत्कार करण्यात आला, त्यात प्रीतीलताचा समावेश होता. ही प्रीतीलता म्हणजे नकुसा. वडिलांना हवा होता मुलगा आणि झाली मुलगी. तिच्या जन्माची किंमत आईला घटस्फोटाच्या रुपानं चुकती करावी लागली. अंगणवाडी कर्मचारी असलेल्या आईनं सत्यशीलाच्या पाठिंब्यानं ती चित्रपटसृष्टीत आली असून इथे करिअर करण्याची जिद्द बाळगून आहे.
प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या नऊ बालिकांचा युनिसेफ आणि सह्या्री वाहिनीच्यावतीनं नुकताच सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रीतीलताला ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.
भारताची फुलराणी सायना नेहवाल नकोशा मुलींपैकीच एक. तिनंच अलीकडं एका मुलाखतीत हे सांगून टाकलं. पण या नकोशा मुलीनं केवळ कुटुंबालाच नव्हे, तर देशाला अभिमान वाटावा असं कर्तृत्व गाजवलं.
प्रातिनिधिक स्वरुपातली कर्तृत्ववान मुलींची अशी अनेक नावं सांगता येतील.
मुलींचं घटतं प्रमाण ही भारताचीच नव्हे तर सर्वच दक्षिण आशियाई देशांपुढची गंभीर समस्या बनली आहे. पारंपारिक मानसिकता, दार्रिय़ अशी अनेक कारणं त्यामागं आहेत. त्यांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातून छोटे छोटे प्रयोग किंवा उपक्रम आकाराला येत आहेत.
..
मुलगी नको मुलगा हवा, ही मानसिकता जागतिक पातळीवरची आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. खेडय़ापाडय़ांतून पूर्वापार ही मानसिकता जोपासली जातेय. आपण कितीही पुढारलेपणाच्या गप्पा मारत असलो तरी आजही अशी मानसिकता मोठय़ा प्रमाणावर आढळते. काही भटक्या जमातींमधून मुलींच्या जन्माचे उत्सव साजरे केले जातात, मात्र जिथं संपन्नता आणि समृद्धी आढळते तिथं मात्र मुलगी ओझं वाटते. इस्टेटीचा वारस ही त्यांची पहिली डिमांड असते. बडय़ा लोकांपुरती ही मानसिकता आहे असं नाही. मुलीच्या जबाबदारीचं ओझं वाटत असल्यामुळं गरिबीतही अशीच मानसिकता आढळते. महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ांतून या मानसिकतेचं दर्शन अनेक प्रकारे घडत असतं. मुलीच्या जन्माचा आनंद फार कमी प्रमाणात साजरा केला जातो. किंबहुना मुलगी झालेला बाप चेहरा पाडूनच फिरताना दिसतो. मुलगा हवा असताना झालेल्या मुलीच्या जन्माचा निषेध नोंदवण्याचे अनेक मार्ग अवलंबले जातात. प्रीतीलता सुरवसेच्या आईला घटस्फोटाची किंमत मोजावी लागली, तशी तर अनेक महिलांना मोजावी लागते. घटस्फोट दिला जात नाही, तिथं मुलगा न होणाऱ्या महिलेला सातत्यानं मानहानी सहन करावी लागते. हे झालं मुलीच्या आईचं. पण जी मुलगी जन्माला आली, तिलाही हे भोग टळत नाहीत. त्यातला पहिला मार्ग अवलंबला जातो, तो म्हणजे तिचं नामकरण. ‘नाव ठेवणं’ असं त्याला बोली भाषेत म्हणतात. ‘नावं ठेवल्यासारखंच’ हे नाव ठेवलं जातं. त्यातूनच दगडी, धोंडी अशी नावं ठेवली जातात. यातलं शेवटचं टोक असतं, ते म्हणजे ‘नकुसा.’ नकोशी असताना झालेली मुलगी ती नकुसा. हाक मारतानाच तिला तिच्या नकोशा जन्माची जाणीव व्हावी, अशा रितीनं हे नाव ठेवलं जातं आणि मुलीच्या जन्माचा निषेध नोंदवला जातो. पश्चिम महाराष्ट्रात सहज धांडोळा घेतला तर अशा अनेक नकुसा आढळतील.
असाच धाांडोळा सातारा जिल्ह्यात घेण्यात आला. साताऱ्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सुधा कांकरिया यांनी त्यांना कल्पना सुचवली आणि त्यांनी तिला प्रतिसाद दिला. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कामाला लावून गावोगावी एक शोधमोहीम सुरू केली. काय होती ही मोहीम? शून्य ते सोळा वयोगटात ‘नकुसा’ नावाच्या मुलींच्या शोधाची. आरोग्य यंत्रणेनं जिल्ह्यातील घरोघरी जाऊन मुलींची माहिती गोळा केली. तब्बल सहा महिने मोहीम सुरू होती. त्या माध्यमातून मुलींच्या नावाचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात शून्य ते सोळा वयोगटातील दोनशे बावीस नकुसा असल्याचं या मोहिमेत आढळून आलं.
कोरेगाव आणि वाई या दोन तालुक्यांमध्ये नकुसा नावाची एकही मुलगी आढळली नाही. बाकी सगळीकडं या नकुसा होत्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पाटण तालुक्याचे मूळ रहिवाशी. या मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यात तब्बल ब्याण्णव नकुसा आढळल्या. त्याखालोखाल मराठी साहित्याचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणदेशात म्हणजे ‘माण’ तालुक्यात छप्पन्न नकुसा आढळल्या. कराड तालुक्यात सोळा, महाबळेश्वर तालुक्यात बारा, सातारा, फलटण आणि खंडाळा तालुक्यात प्रत्येकी अकरा आणि जावळी तालुक्यात पाच नकुसा आढळून आल्या.
आपला जन्म नकोसा होता, हे नावामुळंच या मुलींच्या लक्षात येतं आणि तशाच दबलेल्या मानसिकतेत त्या जगत राहतात. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक विकासावर होतो. हे लक्षात आल्यामुळं केवळ नकुसांचा शोध घेऊन ही मोहीम थांबणार नाही. त्यापुढचा टप्पा आहे, या नकुसांचं नाव बदलण्याचा. या मुलींना भविष्यात ‘नकुसा’ नावानं कुणी हाक मारू नये आणि तिच्या नकोशा जन्माची आठवण पुन्हा काढू नये, यासाठी हे नामकरण करण्यात येणार आहे.
‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा..’, एवढंच नेहमी सांगितलं जातं. आपणही तेवढय़ाच ओळीचा सतत उच्चार करीत असतो. परंतु मुलाच्या कर्तृत्वाचा जयजयकार करणारी ही ओळ अर्धीच आहे. चोखा मेळ्यांनी त्याच्यापुढं जे म्हटलंय ते कधी सांगितलंच जात नाही. ‘कन्या ऐसी तरी देई, जैसी मीरा मुक्ताबाई, इतुके ना देवे तुझ्याने, माझे होई गा निसंतान..’ यातलं कन्या ऐसी तरी देई, जैसी मीरा मुक्ताबाई. महाराष्ट्रच्या खेडय़ापाडय़ांतून ‘नकुसा’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या अशा अनेक मीरा मुक्ताबाई आहेत. साताऱ्यात राबवलेला ‘नकुसा होणार लाडकी’ हा उपक्रम महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर