मा. पृथ्वीराजबाबांची डायरी

दिल्ली सोडून मुंबईला जाताना मनात संमिश्र भावना दाटून आल्या. इथलं काय काय सामान बरोबर घ्यायचं आणि काय काय इथंच सोडायचं हे ठरवायला बराच वेळ लागला. पुस्तकं तर सोबत घ्यायलाच पाहिजेत. पण स्वेटर, जाकिटांचं ओझं कशाला घ्यायचं, यावर सगळ्यांचंच एकमत झालं. मुंबईतल्या उकाडय़ात हे सगळं निरुपयोगी ठरणार. राजीवजींनी आग्रह केला म्हणून राजकारणात यावं लागलं. जीव रमवण्यासाठी आपण राजकारणात आलोच नव्हतो. त्यामुळं या दिल्लीत जीव रमत नाही, असं म्हणण्याची वेळ आली नाही. सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं, पण हळुहळू अंगवळणी पडत गेलं सगळं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. कार्यक्षेत्र विस्तारत गेलं. खूप माणसं पाहता आली. अनेकांशी बंध निर्माण झाले. त्या सगळ्यांना सोडून जातानाची हुरहूर आहेच. पण दिल्लीतल्या थंडीला मात्र कायमचं मुकणार आहोत, ती सतत आठवत राहील. दिल्लीशी जोडणारा तेवढाच भावनिक धागा आहे..
..
गेली दोन-तीन वर्षे मुंबई खुणावत होती. आपल्याला दिल्लीतला मुक्काम हलवून मुंबईत जावं लागणार, याचे संकेत मिळत होते. पण आपल्याच मनाची तयारी होत नव्हती. तशी मुंबईची ओढ कधीच नव्हती आणि कधी तिच्याशी भावनिक नातं निर्माण होण्यासारखा संबंधही आला नव्हता. बालपणापासून दिल्लीतच अधिक दिवस गेल्यामुळे लांब असली तरी दिल्ली परकी वाटली नाही. इथल्या थंडीत प्रीतीसंगमावरच्या थंडीची आठवण व्हायची आणि मन थेट कृष्णाकाठी धाव घ्यायचं. नाही नाही म्हणता म्हणता दिल्लीतला मुक्काम आवरता घेऊन मुंबईत दाखल व्हावं लागलं. दिल्लीत कराड, कुंभारगावची माणसं फारशी भेटत नव्हती, आता ती सारखी भेटत राहतील. (त्यांना पुढच्या काळात टाळायचं कसं, हे जुन्या-जाणत्यांना विचारून घ्यायला पाहिजे.) दिल्लीतून मुंबईत म्हणजे एकदम गर्दीत आल्यासारखं वाटतंय. दिल्लीतही गर्दी होती, पण आपल्या अवती-भोवती आणि पुढं पुढं करणारी माणसं नव्हती. आणि तेच तेच चेहरे सारखे सारखे दिसताहेत गेले काही दिवस. काही ओळखीचे. बरेचसे अनोळखी पण अनेक वर्षाचा परिचय असल्याचं भासवणारे. कुणाला ओळख द्यायची आणि कुणाला नाही, हे सुद्धा समजून घ्यायला हवं.
..
मुंबई-दिल्ली विमानप्रवास
..
अँटनी दिल्लीत नसल्यामुळे भेट होऊ शकली नाही. प्रणवदाही बिझी आहेत.
..
मॅडमही महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात आलं
.
मुंबई-दिल्ली विमानप्रवास.
...
मध्यरात्री एक वाजता फोन वाजला. हल्ली दिल्लीचे फोन येण्याला काळ-वेळ नसतो. त्यामुळं फोन बंद किंवा सायलेंटवर ठेवता येत नाही. रिंग वाजत असताना दुर्लक्षही करता येत नाही. आलेला फोन घ्यावाच लागतो. रिसिव्ह केला, तर पलीकडून आवाज आला, त्यांनी नावही सांगितलं, पण ते लक्षात आलं नाही. आपण काँग्रेसचे आमदार आहोत, असं पलीकडची व्यक्ती सांगत होती, एवढं माझ्या लक्षात आलं. नाहीतर एवढय़ा रात्री झोपेत असताना काय काय लक्षात ठेवणार. मंत्रिमंडळाच्या यादीत आपलं नाव आहे का, असं ते विचारत होते. सकाळी फोन करा म्हणून फोन बंद केला. तर तासाभरात वेगवेगळे चार फोन आले. मग कंटाळून बंद केला. झोप नीट झाली नाही तर तब्येत बिघडायची. अजून दिल्लीला किती फेऱ्या मारायला लागतील, याचा अंदाज नाही. अशा वेळी तब्येत राखली पाहिजे. सरकारच्या कामाला सुरुवात करून गाडीने लवकर पिकअपही घ्यायला हवा. तब्येत सांभाळूनच राहायला हवं.
..
पुन्हा दिल्ली. मनमोहनसिंगांची भेट घेतली. खूप सद्गदित झाले. मलाही खूप वाईट वाटलं, निरोप घेताना. एवढी सज्जन माणसं फार क्वचित आयुष्यात येतात. त्यासाठी भाग्य असावं लागतं, असं म्हणतात.
..
यादी फायनल करून मुंबईत परत. संध्याकाळी पुन्हा दिल्लीचे फोन किरकोळ फेरबदल. हुश्श केलं. पण फोन थांबेचनात. पहाटे अडीचर्पयत दहा वेळा दुरुस्त्या केल्या. शेवटी मूळची यादी कोणती आणि दुरुस्त्या केलेली अंतिम यादी कोणती, माझं मलाच कळेना. कन्फ्यूजनही कन्फ्यूजन.सोल्यूशन कोई पता नही, अशी अवस्था झाली. शेवटी जाकिटाच्या एका खिशात जी यादी सापडली, तीच फायनल करून टाकली. म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे. पुढचं पुढं पाहून घेऊ. सोनिया मॅडमनी हीच फायनल केलीय म्हणून सांगून टाकू..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर